Vihann News
728x90 Ad Slot

'विटा पालिका कोणाच्या बापाची नाही, ती सामान्य जनतेची'; आमदार सुहास बाबर यांचा प्रशासनाला कडक इशारा

जानेवारी ०५, २०२६




विटा: "विटा नगरपालिकेवर मिळालेला हा ऐतिहासिक विजय माझ्यासाठी आमदारकीपेक्षाही मोठा आहे. ही सत्ता कोणत्याही एका व्यक्तीची किंवा हुकूमशाहीची नसून ती सामान्य विटेकर जनतेची आहे. नगरपालिकेत येताना सर्वसामान्यांच्या मनात कोणतीही भीती नसावी. पालिका कोणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे हे लक्षात ठेवून अधिकारी आणि नगरसेवकांनी काम करावे," अशा कडक शब्दांत आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाला सुनावले.
विटा नगरपालिकेच्या नूतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी ५५ वर्षांची प्रस्थापित सत्ता उलथवून लावल्याचा आनंद व्यक्त करताना बाबर भावूक झाले.


"तुम्ही नगरसेवक म्हणून लोकांकडे जाऊ नका, तर त्यांचे सेवक म्हणून त्यांच्या दारापर्यंत पोहोचा. विट्याचा प्रत्येक सामान्य नागरिक जेव्हा पालिकेत येईल, तेव्हा त्याला आपणच इथले 'महापौर' आहोत असा सन्मान मिळाला पाहिजे."  — आमदार सुहास बाबर

वडिलांची उणीव आणि ५५ वर्षांचा इतिहास
आपल्या भाषणाची सुरुवात करताना आमदार बाबर म्हणाले की, "आजच्या या ऐतिहासिक क्षणी माझे वडील स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांची उणीव प्रकर्षाने भासत आहे. विटेकर जनतेने माझ्यासारख्या कमी वयाच्या कार्यकर्त्यावर जो विश्वास टाकला, तो सार्थ ठरवेन. ५५ वर्षांची सत्ता उलथवून लावणे सोपे नव्हते, पण लोकांशी असलेल्या भावनिक नात्यामुळे हे शक्य झाले." आई आणि काजल काकी यांचा उल्लेख करताना त्यांनी विजयाचे श्रेय सर्व कार्यकर्त्यांच्या त्यागाला दिले.
प्रशासनाला सज्जड दम: 'तुमचा प्रोग्राम केल्याशिवाय राहणार नाही'
नगरपालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य करताना बाबर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. "नगरपालिकेत पैशांचा एकही चुकीचा व्यवहार खपवून घेतला जाणार नाही. ज्यांना जुन्या सवयी आहेत, त्यांनी त्या वेळीच सुधाराव्यात. तुम्हाला सरकार पगार देते, तो लोकांची सेवा करण्यासाठी. जर कोणी सर्वसामान्यांकडून कामासाठी पैसे मागितले, तर त्यांचा 'प्रोग्राम' केल्याशिवाय मी राहणार नाही. मला तुमची चहा देखील नको आणि माझ्यावर कोणाचा दबाव चालणार नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
देशात नंबर वन बनवण्याचे स्वप्न
केवळ स्वच्छता मोहिमेतच नव्हे, तर प्रशासकीय कामात आणि पारदर्शकतेतही विटा नगरपालिका देशात पहिल्या क्रमांकावर आली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी प्रत्येक वॉर्डात दरमहा 'नोडल ऑफिसर'च्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बैठका घेण्याचे आदेश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.
नगरसेवकांना कानमंत्र
निवडून आलेल्या २२ नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "विजयाचा गुलाल उधळताना पराभूत झालेल्या आपल्या सहकाऱ्यांचे योगदान विसरू नका. निवडणुकीनंतर आता कोणाशीही वैर ठेवू नका. जो आपल्या विरोधात होता, त्याचेही काम तितक्याच आदराने करा. लोकांचा सन्मान राखणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे."


थेट संवाद आणि पारदर्शक कारभाराचा 'विटा पॅटर्न'

आमदार सुहास बाबर यांनी नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी कामाची नवीन नियमावलीच जाहीर केली आहे.

  • वॉर्ड स्तरावर दरमहा दरबार: प्रत्येक नगरसेवकाने दर महिन्याला आपल्या वॉर्डात नागरिकांची बैठक घेणे बंधनकारक आहे.
  • नोडल ऑफिसरची नियुक्ती: वॉर्डातील बैठकीला मुख्याधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला 'नोडल अधिकारी' उपस्थित राहील. नागरिकांच्या तक्रारींची नोंद करून त्या सोडवल्याचा अहवाल या अधिकाऱ्याला द्यावा लागेल.
  • केबिन संस्कृतीला लगाम: अधिकाऱ्यांनी केवळ केबिनमध्ये बसून न राहता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आणि लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
  • दहशतमुक्त पालिका: नगरपालिकेत येणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात भीती नसावी. "पालिका ही कोणा एकाची मालमत्ता नाही, तर ती जनतेची आहे," हा भाव प्रशासनाने जपावा.
  • सूडबुद्धीचे राजकारण बंद: निवडणुकीतील हार-जीत विसरून, ज्यांनी मतदान केले नाही त्यांचेही काम सन्मानाने आणि तत्परतेने करण्याच्या सूचना त्यांनी सर्व २२ नगरसेवकांना दिल्या.
  • <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1317720897412387"
         crossorigin="anonymous"></script>